कान्हूर मेसाई,शिरूर : तीव्र दुष्काळाचे चटके बसत असलेल्या शिरूर तालुक्यातील केंदूर व कान्हूर मेसाई येथे सुरू असलेल्या चारा छावणीस आज विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देत छावणीत दाखल झालेल्या जनावरांचे होत असलेले व्यवस्थापन व तेथील नागरिकांना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भेडसावत असलेल्या समस्या ग्रामस्थांशी संवाद साधत जाणून घेतल्या. यावेळी वळसे पाटील यांनी चारा छावणी मध्ये दाखल झालेली जनावरे, त्यांना मिळणारा सुका व ओला चारा, तसेच खुराक यासंबंधीही आढावा घेऊन उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई पाचुंदकर पाटील,अमोल जगताप, भीमाशंकर सह. कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, गावातील व परिसरातील सर्व पदाधिकारी व शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.
तालुक्यातील पाबळ येथे तर दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर झालेला आहे. केंदुर व कान्हुर मेसाई या भागात या अगोदरच चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. पाबळ परिसरात चारा छावण्या सुरू करणे बाबत येथील ग्रामस्थांनी वळसे पाटील यांच्याकडे मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर या भागात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी वळसे पाटील गेल्यानंतर पाबळ परिसरातील ग्रामस्थांशी याबाबत चर्चा केली.तर पाबळ परिसरात चारा छावणी तातडीने कशी सुरू करता येईल बाबत ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून चारा छावण्या लवकरात लवकर सुरु करण्याकामी प्रयत्न करण्याचे आश्वासन वळसे पाटील यांनी दिले.
– प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक,(सा.समाजशील)