वाडा,पालघर : (प्रतिनिधी,संजय लांडगे) – गणेशोत्सवासह गौरी मातेच्या पूजनालाही ग्रामीण भागासह शहरी भागातूनही खूप महत्व आहे.ज्यांच्याघरी गणपती विराजमान आहेत त्यांच्या घरी गौरीचीही स्थपणा केली जाते. तर ज्यांच्या घरी गणपती नाहीत त्यांच्याही घरी श्रद्धापूर्वक गौरीची स्थपणा केली जाते. शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या गौरीची स्थापना करण्यासाठी कोणी गौरीच्या मूर्ती, कोणी फोटो तर अनेक ठिकाणी गवर म्हणून संबोधले जाणारे जंगलातील आठ प्रकारच्या रान फुलांचा पुष्पगुच्छ याला जास्त महत्व दिले जाते, ही गवर जवळपास सर्वच घरांमध्ये आढळते.
शेंदूलीची फुले, हरावल तसेच इतर अशा आठ प्रकारची फुले घेऊन हा पुष्पगुच्छ बनवला जातो. असे सुंदर असे पुष्पगुच्छ आज दि. ५ ला गुरुवारी पालघर जिल्ह्यातील वाडा शहराच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेला पहावयास मिळत होते. या फुलांच्या विक्रीतून आदिवासी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होत असून यातून महिलांना पाचशे ते आठशे रुपयांपर्यत आर्थिक उत्पन्न मिळते. सुर्यमाळ सारख्या अति दुर्गम भागातील महिला ही रानफुले गोळा करून त्याचा पुष्पगुच्छ बनवून वाड्यात विकायला येतात. या व्यवसायातुन त्यांच्या संसाराला चांगलीच आर्थिक मदत होते अशी माहिती सुर्यमाळहून आलेल्या सीता मावशी यांनी सा. समाजशीलशी बोलताना दिली.