नवी दिल्ली : देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनचा हा 5 वा टप्पा हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. १ जूनपासून हे दिशानिर्देश लागू होतील ते ३० जूनपर्यंत कायम असतील. महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्यानं सुरु होणार आहेत. कर्फ्युची वेळ कमी करण्यात आली आहे.आतापर्यंत रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती.मात्र आता रात्री 9 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यु असणार आहे. शाळा, कॉलेज शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेणार आहे. सर्व बाबी पडताळून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. राज्यातही एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. तसंच कुठही येण्या-जाण्यासाठी आता कुठलीही परवानगीची घ्यावी लागणार नाही. राज्यांना केंद्र सरकारने जास्त अधिकार दिले आहेत. बस, मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा आहे.