शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील बेट भागातील नागरिकांना शिक्रापूर,पुणे कडे जाण्यासाठी सोयीस्कर असलेल्या मलठण ते शिक्रापूर या नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर वाघाळे ते शिक्रापूर दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता एक महिन्यातच उखडला असल्याची व जागोजागी खड्डे पडले चित्र पाहावयास मिळत होते. या रस्त्याची अल्पावधीतच झालेली वाताहात व निकृष्ठ काम पाहून संबंधितांवर कडक कारवाई करावी व रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव सोनवणे पाटील व परिसरातील नागरिकांनी केली होती. या समस्येबाबत सा.समाजशील मध्ये दि. ११ ला परखड व सविस्तर वृत्त दिले होते.याची संबंधित विभागाने दाखल घेत केवळ १० दिवसांत या रस्त्याच्या डागडुजी,दुरुस्तीच्या कामास सुरुवात केल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोकराव सोनवणे पाटील, ग्रा.सदस्य.दादाभाऊ सोनवणे,अनिता गावडे, माजी सरपंच तुकाराम भोसले,दिलीपराव थोरात व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करीत साप्ताहिक समाजशीलचे आभार मानले आहेत.
वाघाळे ते शिक्रापूर (मलठणफाटा) या रस्त्याचे काम एक महिन्यापूर्वी पुर्ण झाले. परंतु वाघाळे येथे (बढेवस्ती) आणि गणेगाव खालसा येथे शाळेजवळ घाटात रस्ता खुप खराब झाला होता.त्यामुळे त्या ठिकाणी खडीवरुन गाड्या घसरण्याच्या घटनाही घडल्या होत्या. या रस्त्याने दुचाकी,चारचाकी,शेतमाल,दूध वाहतूक शिक्रापूर,पुण्याकडे मोठ्या प्रमाणात सुरु असते. या खराब झालेल्या रस्त्यावर एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नव्हती. या महत्वपूर्ण प्रश्नी अशोकराव सोनवणे व नागरिकांनी आवाज उठवत मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न मांडल्याने प्रशासनाने त्यावर तात्काळ कार्यवाही करीत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. निदान आतातरी हे दुरुस्तीचे काम चांगले,टिकाऊ,मजबूत व्हावे अशी अपेक्षा अशोकराव सोनवणे पाटील व परिसरातील नागरिकांतून होत आहे.
रस्त्याची दुरुस्ती सुरु रस्त्याची दुरुस्ती सुरु पूर्वीचा रस्ता