मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : भारताच्या १५ व्या राष्ट्रपतीपदी पहिल्यांदाच आदिवासी समाजाच्या महिला विराजमान झाल्याने मुरबाड तालुक्यात भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम भागातील मोहाबाडी येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला. या विजयोत्सवाचे सर्वत्र कौतुक होत असून, आदिवासीं समाजाने आपल्याला न्याय मिळाला असल्याने आता आमच्या विकासाच्या अश्या पल्लवित झाल्याचे दाखवून दिले. देशभर आदिवासी समाज आनंद व्यक्त करत असताना मुरबाड तालुक्यातील दुर्गम टोकावडे विभागातील मोहवाडी (वैशाखरे) येथे मोठ्या जल्लोषात आदिवासी बांधवानी विजयोत्सव साजरा केला. यावेळी आमदार किसन कथोरे यांचे आदिवासी बंधू- भगिनींनी पारंपारिक वेशभूषा व नृत्य गाणी गात त्यांचे स्वागत केले. या ठिकाणी पार पडलेल्या आनंदोत्सवात आमदार किसन कथोरे यांनी देशाच्या सर्वोच्च पदाचा बहुमान माझ्या आदिवासी समाजाला दिल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले तर. शेवटच्या माणसाचा विकास व सन्मान हे भाजपचे धोरण असून, आज आदिवासी समाजाची मान उंचावली आहे. कातकरी आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात येण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे, व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता घटणारी लोकसंख्या अबाधित ठेवावी असा सल्ला यावेळी दिला. 25 जुलैला राष्ट्रपती पदाचा कार्यभार द्रौपदी मुर्मु यांनी स्वीकारल्या नंतर सर्व शासकीय कार्यालयात त्यांचा फोटो लावण्याचा उपक्रम हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
दुर्गम भागात रहाणाऱ्या गाव खेड्यातील आदिवासी समाजाचा विकासासाठी त्यांचा रोजगार, शिक्षण, दळणवळण, आर्थिक विकास यासाठी सरकारनं प्रयत्न केला पाहिजे. आजही आदिवासी नागरिकांकडे रेशनकार्ड, आधारकार्ड, यासारखे कागद पत्र नसल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. अनेक गावांना जाण्यासाठी रस्ते नाहीत, पाण्याच्या योजना नाही, शिक्षणासाठी पायपीट करावी लागते, तर रोजगारासाठी स्थलांतरीत होण्याची वेळ येते. देशाच्या सर्वोच्च असलेल्या राष्ट्रपती पदावर आज आदिवासी समाजाच्या महिला द्रौपदी मुर्मु यांची निवड झाल्याने तळागाळातील आदिवासी समाजाचा खरच विकास होणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या विजयोत्सवाचे आयोजन दुर्गम भागातील माळ व वैशाखरे गटातील भाजप कार्यकर्त्यांनी केले होते. या प्रसंगी माजी आमदार कृष्णकांत तेलम, भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, सभापती स्वराताई चौधरी, माजी सभापती दिपक पवार, दत्तू वाघ, माजी उपसभापती, सीमाताई घरत, माजी पं.स. सदस्य अनिल घरत, सरचिटणीस सुरेश बांगर, युवा मोर्चाचे चेतन घुडे, जिल्हा परिषद सदस्या नंदाताई उघडा, सामाजिक कार्यकर्ते रमेश उघडा, जि.प.सदस्य गोविंद भला, पंचायत समिती सदस्या जयाताई वाघ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.