शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यात सतत सात दिवसांपासून ई पॉस मशीन बंद असून स्वस्त धान्य वितरणात मोठीच अडचण निर्माण झाली आहे.ई पॉस मशीन सुरु होण्यासाठी तात्काळ कार्यवाही करा अन्यथा ई पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करू असा इशारा शिरूर तालुका रास्त भाव दुकानदार असोसिएशनच्या वतीने आज दि. ३० ला शिरूर तहसीलदारांना निवेदना द्वारे देण्यात आल्याची माहिती शिरूर तालुका रास्त भाव दुकानदार असोसिएशनचे तालुका अध्यक्ष गणेशराव माधवराव रत्नपारखी यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
साधारणपणे नवीन ईपॉस मशीन मिळाल्यापासून सर्व्हर नीट चालत नाही, नेट नाही, पिशव्या,साड्या, धान्याच्या वेगवेगळ्या पावत्या, प्रत्येक वेळी वेगळा अंगठा व्हेरिफिकेशन, के. वाय.सी इत्यादी कामे करताना दुकानदारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शिरूर तालुक्यात सातत्याने ढगाळ वातावरण असून ग्रामीण भागातील शेतीची कामे सोडून बहुतेक ग्राहक स्वस्त धान्य घेण्यासाठी रोज दुकानात हेलपाटे मारत आहेत. परिणामी ग्राहक आणि दुकानदार यांची वादावादी होण्याचे प्रकार घडत असून टेक्निकल प्रॉब्लेम आहे हे सांगून ग्राहकांचे समाधान होत नाही. त्यामुळे प्रशासनाने यामध्ये सकारात्मक तोडगा काडून प्रेसनोटं द्यावी किंवा वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन द्यावे हि विनंती. अन्यथा ५ ऑगस्ट २०२४ रोजी तालुक्यातील सर्व मशीन आपल्या कार्यालयात जमा करण्यात येतील असा इशारा तालुका संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला अन्नदिवस असतो या दिवसाच्या आतमध्ये दुकानात धान्य येणे अपेक्षित आहे असे असताना काही दुकानदारांना महिन्याअखेर पर्यंत धान्य मिळते नंतर मशीन चालत नाही यामध्ये दुकानदाराचा दोष नसताना त्याला ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे रत्नपारखी यांनी सांगितले. त्यामुळे पुढील महिन्यासाठी धान्य वाटपा करिता लवकर उपलब्ध व्हावे. ई पॉस मशीन सुरळीत चालण्यासाठी संबधीत सर्व्हर व्यवस्थित चालावा आणि दुकानदाराचे महिन्याचे कमिशन वेळेच्या वेळी मिळावे. तसेच धान्य व किरकोळ केरोसीन परवाने चलन फी विहित मुदतीत भरणा करून
देखील त्यांचे नूतनीकरण झालेले नाहीत. संबधीत परवाने नूतनीकरण करून तात्काळ मिळावेत अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे.