समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई,मलठण सह बेट भागातील अनेक गावांत युरिया खताची मोठीच कमतरता जाणवत असून युरिया उपलब्ध असताना अनेकदा त्या बरोबर लिंकिंगची खते,औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याने शेतकरी चांगलेच वैतागले आहेत.आता रब्बीचा हंगाम सुरु असून शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत. सध्या ऊस,गहू व इतरही पिकांना पाण्याबरोबरच युरियाची मात्रा देणे आवश्यक असताना अनेक गावातील दुकानातून युरिया उपलब्ध नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने शासकीय दरात शिरूरच्या पश्चिम भागातील गावात तात्काळ युरिया खत उपलब्ध करून शेतकऱयांना दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
युरिया खताच्या कमतरते बाबत पुणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता ते म्हणाले कि, मागील काही दिवसांत ६०० मेट्रीक टन व नुकताच २०० मेट्रीक टन युरिया शिरूर तालुक्यासाठी देण्यात आला असून या महिना अखेर पर्यंत युरियाचा पुरवठा नक्कीच सुरळीत होईल असे आश्वासन सा. समाजशील शी बोलताना दिले आहे.सातत्याने अनेक संकटांचा सामना करावा लागणाऱ्या बळीराजाचे हित पाहून आता सरकारनेच युरिया बरोबर लिंकींगची खते,औषधे देणा-या कंपन्यावरच ठोस कारवाई करून लिंकिंग बंद करण्याची व फक्त युरिया खत शासकीय भावातच उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तालुक्यातील अनेक गावातील युरियाच्या कमतरते बाबत शिरूरच्या कृषी विभागाचे गुण नियंत्रक संपत कांठाळे यांना विचारले असता युरिया खताची मागणी नोंदविण्यात आली असून शक्य होईल तेवढ्या लवकर ज्या भागात युरिया उपलभद्ध नाही तेथे युरिया उपलब्ध होताच तातडीने युरिया खत उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन दिले आहे.



