टाकळी हाजी, शिरूर : शिरूरच्या बेट भागात काल दि.७ रोजी झालेल्या मान्सूनपुर्व वादळी पाऊसाने टाकळी हाजी – जांबुत रस्त्यावर जुने बाभळीचे झाड पडल्याने रस्त्यावर खुप मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सुदैवाने कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे झाड रस्त्यावरून त्वरीत हटवावे अशी मागणी नागरिक व प्रवाशांनी केली आहे.
शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह व मोठ्या वादळी वा-या सह पाऊसाने सुमारे अर्धा ते एक तास जोरदार हजेरी लावली .या पाऊसामध्ये अनेक झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब देखील पडले होते. मान्सूनपुर्व पाऊसाच्या पहिल्याच हजेरीने या भागात खुप नुकसान झाले असून या भागात विजेचे पोल पडल्याने संपूर्ण बेट भाग रात्री अंधारात होता.परंतु महावितरण कर्मचा-यांच्या अथक प्रयत्नातून आज दुसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी वीज पुरवठा पूर्ववत सुरु झाला. वीज गायब झाल्याने नागरिकांना असह्य उकाड्या बरोबरच पिण्याच्या पाण्याची खुप पंचाईत झाली होती. टाकळी हाजी – जांबुत रस्त्यावरील शिंदेवस्ती येथील झाड रस्त्यावर तसेच आडवे पडल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत होता.
-प्रतिनिधी, सतिश भाकरे,(सा.समाजशील,टाकळी हाजी)