मुरबाड,ठाणे : ( प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करताना हलगर्जीपणा करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध मुरबाड तहसील कार्यालयासमोर आज शुक्रवारी ता 1 रमेश हिंदुराव,भरत दळवी,विष्णू चौधरी आदींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन नुकसानीचे सर्व्हे करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश असतानाही गावागावात याबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या तलाठी,ग्रामसेवक, कृषिसहायक यांच्याविरुद्ध कारवाई करावी, तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , 2017 सालाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, पीक कर्ज माफी व्हावी,सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार बंडू जाधव, तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांना याबाबतचे निवेदन दिले.
याच विषयास अनुसरून आज श्रमजीवी संघटना महाराष्ट्रच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करताना 7/ 12 उतारे नावावर नसलेल्या वनपट्टे धारक, प्रलंबित वनदावे धारक शेतकऱ्यांना सामावून घ्यावे, शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून वर्षभर दरमहा 35 किलो धान्य द्यावे आदि मागण्या करण्यात आल्या. सत्याग्रहाचे नेतृत्व अध्यक्ष वसंत मुकणे ,जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके,सचिव दिनेश जाधव आदिंनी केले.