मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी :-जयदीप अढाईगे) – वारंवार अपघात होणाऱ्या कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग 61 वर विविध उपाययोजना करून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी लक्ष देण्याची मागणी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे यांचेकडे एका निवेदनाद्वारे मुरबाड तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन्ही बाजूच्या साइड पट्टीवर वाढलेले गवत झाडे झुडुपे तातडीने काढून टाकावी , साइड पट्टी व डांबरी रस्ता या मधील उंचीचा फरक माती व मुरूम टाकून समान उंची करण्याचे काम तातडीने हाती घेतल्यास रस्त्याची रुंदी सहा फुटाने वाढू शकेल व अरुंद रस्त्यामुळे समोरा समोर होणारे वाहनांचे अपघाताचे प्रमाण कमी होईल व लोकांचे जीव वाचतील असे ही निवेदनात म्हटले आहे.रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे, मुरबाड तीन हात नाका येथे गतिरोधक बसवावा,रस्त्यावर टाकलेल्या गती रोधकावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावे, कल्याण मुरबाड रस्त्यावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जुने शहाड फाटक येथे रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधावा ,पंजारापोळ येथे असलेले वळण काढावे अशा विविध मागण्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव, आत्माराम सासे , नरेश देसले आदि नागरिकांनी दिले आहे.
मात्र रोज होणाऱ्या या अपघातांना प्रशासनाचा भोंगळ कारभार व वाहन चालकांची बेबंद शाही तेवढीच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. शहाड ते मुरबाड जुना पेट्रोल पंप या हद्दीत कल्याण राष्ट्रीय महामार्ग उपविभाग तर मुरबाड ते माळशेज घाट पर्यत मुरबाड उपविभागीय कार्यलयातून कारभार सांभाळला जातो मात्र दिखाऊ कामे करून वेळ भागवली जाते तर दिखाऊ कामावर वाहन चालक फसतात अपघात होतात. यामुळे ह्या महामार्गाची ओळख अपघात ग्रस्त अशी बनली आहे.
या बाबत कल्याण नगर राष्ट्रीय महामार्ग मुरबाड उप विभाग अधिकारी एस व्ही पाटील यांना विचारले असता
मुरबाड माळशेज घाट रस्त्याच्या दुतर्फा साइड पट्टीला भराव टाकण्याचे काम करण्यासाठीचा प्रस्ताव दिल्ली येथे मंजुरी साठी पाठवला आहे त्याला मंजुरी मिळाल्या नंतर निविदा प्रक्रिया करून कामाला सुरुवात होईल मागच्या वर्षी निधी न मिळाल्याने काम करता आले नाही असे सांगितले.