कांद्याला मिळतोय ५० रुपये किलोपर्यंत दर; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

6

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) –  शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई,सविंदणे,मलठण,जांबुत,पिपरखेड,वडनेर,टाकली हाजी,आमदाबाद परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मिळत असलेल्या समाधानकारक बाजारभावामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील दोन वर्षांपासून कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र,आता चांगल्या कांद्याला सुमारे ४० ते ५० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील मुरमाड जमिनीत मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतले जाते. कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत रासायनिक खते,औषधांची फवारणी, मजुरी आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे बाजारभाव कमी मिळाल्यास उत्पादन खर्चही वसूल होत नाही.मागील दोन वर्षांत कांद्याला योग्य बाजारभाव न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते.त्याचा परिणाम कांदा लागवडीच्या क्षेत्रावरही झाला. यंदाच्या उन्हाळी हंगामात उत्पादित केलेला कांदा अनेक शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवला होता. योग्य दर मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेला हा कांदा आता बाजारात विक्रीसाठी पाठविण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला मिळणारा ४० ते ५० रुपये किलोपर्यंतचा दर उत्पादन खर्च भरून काढण्यास मदत करणारा ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काही प्रमाणात नफा शिल्लक राहण्याची अपेक्षा आहे.“कांदा पिकासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागतो. खत, औषधे, लागवड, काढणी,पाणी व्यवस्थापन आणि मजुरीचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मिळणारा सध्याचा दर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे,” अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *