समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई शिवारातील गणेश नगर परिसरात काल रात्री आठच्या नंतर व आज शुक्रवार दि.६ ला दोन शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले करीत दोन मेंढ्या ठार,दोन शेळ्या जखमी तर अनेक कोंबड्याही बिबट्यांनी फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्या परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. बिबट्यांच्या पाळीव जनावरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे मुक्या प्राण्यांचे नाहक बळी जात असून शेतकऱ्यांना मोठ्या च आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे कवठे येमाई परिसरात बिबट्यांची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे.मेंढपाळ शेतकरी मोहन खोडा तांबे आपल्या कुटुंबियांसमवेत गणेशनगर येथील शेतकरी सावकार मुलमुले यांच्या शेतात आपल्या बकरांचा तळ ठोकून असून मेंढ्याना परिसरात चारण्याचे काम करून उपजीविका करीत आहेत. तांबे यांनी त्या शेतात आपल्या मेंढ्यांसाठी जाळी लावलेली असून त्यावरून बिबट्याने आत उडी मारत प्रवेश करुन आत मध्ये बांधलेल्या एका मोठ्या नर मेंढ्यास ठार केले.या घटनेने मेंढपाळ तांबे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.तर दुस-या घटनेत गांजेवाडी रस्त्या नजीक वास्तव्यास असणारे सावकार भोर यांच्या गोठ्यातील जनावरांवर हल्ला चढवत एक मेंढी ठार केली. तर दोन शेळ्या गंभीर जखमी केल्या तर जाळी वरून गोठ्यात प्रवेश करीत बिबट्यांनी आणखी एक शेळी गायबच केली तर खुराड्यातील आठ दहा कोंबड्या बाजूकडील शेतात नेऊन फ़स्त केल्या आहेत. कवठे येमाई शिवारात या वारंवार अशा घटना घडत असल्याने पाळीव पशुधनाचे संरक्षण कशा प्रकारे करावे ? हा प्रश्न पशुपालक,मेंढपाळ शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पशुपालन करणारे शेतकरी त्रस्त झाले असून बिबट्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांचे नाहक बळी जात आहेत. बिबट्याच्या वाढत्या दहशतीने बिबट्यांना पिंजऱ्यात पकडण्यासाठी शिरूर वन विभागाने योग्य त्या उपाययोजना तात्काळ करण्याची मागणी राष्ट्रीय किसान विकास मंच चे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार व महाराष्ट्र प्रदेशासध्यक्ष प्रा.पत्रकार सुभाष अण्णा शेटे यांनी केली आहे.या घटनांबाबत शिरूर वन विभागास तात्काळ माहिती देण्यात आली असून घटनेचा शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नितीन म्हात्रे, वनसेवक हनुमंत कारकुड यांनी पंचनामा केला आहे. तर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांची नुकसान भरपाई शासन नियमानुसार मिळणार असल्याचे शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.