समाजशिल न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या बेट भागातील सर्व सामान्य नागरिकांना शिक्रापूर, पुणे कडे जाण्यासाठी महत्वाचा रस्ता असणाऱ्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर – वाघाळे – मलठण अशा प्रमुख दळणवळणाच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून या रस्त्याची अनेक ठिकाणी वाट लागली आहे. या रस्त्याने जाताना वाहन धारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.संबंधित रस्ते विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या तात्काळ दुरुस्ती साठी वेळेत लक्ष घालून या वाट लागलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाघाळे येथील सामाजिक कार्यकर्ते अशोकराव सोनवणे पाटील, माजी उपसरपंच दिलीपराव थोरात,चेअरमन विजय शेळके व ग्रामस्थांनी केली आहे.या रस्त्याच्या दुरुस्ती कडे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष न दिल्यास या प्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा वाघाळे ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.

मलठण – शिक्रापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरील गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांना, उद्योग, व्यवसाय, शाळा, महाविद्यालय याकरिता शिक्रापूर किंवा पुणे येथे जावे लागत असून वाहतुकीची मोठी वर्दळ या रस्त्याने असते.अशा खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून जीवघेणा प्रवास करावा लागत असून, रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे सातत्याने अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. शिक्रापूर – मलठण रस्ता खूप धोकादायक झाला असून गणेगाव येथील घाटात तसेच कामिनी नदीवरील अर्धवट स्थितीत असलेल्या पुलावरील आणि वाघाळे येथील बढे वस्ती येथे रस्त्यावरती अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या परीसरात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेक नागरिक जखमी होत आहेत. तसेच वाहनांचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रस्त्याचे काम मंजूर असून ते लवकरात लवकर सुरु करण्यात यावे किंवा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी वाघाळे ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.