समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई परिसरात मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठेच नुकसान झाले आहे. याबाबत शिरूरचे कार्यतत्पर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांनी दूरध्वनीवरून वस्तुस्थितीची माहिती तात्काळ दिल्यानंतर त्यांनी लगेचच आदेश काढत पंचनामा करण्याच्या तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक व संबंधितांना सूचना दिल्या आहेत.ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव , सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव,ग्राम महसूल सेवक लव्हाजी सांडभोर यांनी प्रत्यक्ष शेतावर जात पंचनामे सुरु केले आहेत.
विजांचा कडकडाट, जोरदार वारा,पाऊस यात शेतात उभी असलेली कांदा, मका, हरभरा,तरकारी पिके व इतर पिकांचे मोठेच नुकसान झाले आहे. विशेषेकरून शेतात तयार झालेला कांदा,फळबागांचे मोठेच नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सुरु करण्यात आल्याने ग्रामस्थांनी,शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून पंचनामे झाल्यानंतर बाधीत शेतकऱयांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याची मागणी माजी सरपंच बी.एम पोकळे यांनी सा.समाजशिलशी बोलताना व्यक्त केली आहे.

दरम्यान आज सकाळपासूनच पुन्हा वातावरणात बदल झाला असून सकाळ पासून च ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.अद्यापही वादळी,अवकाळी पावसाची टांगती तलवार असून वादळी पाऊस,गारपीट झाल्यास शेतातील इतर पिकांना ही मोठा फटका बसण्याची शक्यता शेतकरी विलासराव रोहिले,रामदास पवार,एकनाथ गावडे,निमगाव दुडेचे रामदास (बंडू) कांदळकर यांनी व्यक्त केली आहे. .
मागील महिन्यात झालेल्या जोरदार वादळी पावसाने कवठे यमाईच्या साईनगर, मुंजाळवाडी,गांजेवाडी, हिलाल मळा, रोहिलेवाडी परिसरातील शेतीला मोठा च दणका बसला होता. कर्ज काढून शेती जागविण्याचा प्रयत्न करू पहाणाऱ्या जगाचा पोशिंदा म्हणून संबोधला जाणाऱ्या शेतकरी राजाने चोहोबाजूंनी आर्थिक संकटाचा सामना करायचा कसा ? व शेतकऱ्यांनी जगायचे कसे ? असा प्रश्न या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱयांमधून व्यक्त होत आहे. शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ् यांना तात्काळ भरीव मदत मिळणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय किसान विकास मंच चे राष्ट्रीय महासचिव रविंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे.