समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे,(प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे शहरातील धनकवडी परिसरात के. के. मार्केट समोर ओढ्यालगत पानपट्टीजवळ असलेला सुमारे दहा फूट खोल धोकादायक खड्डा नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तो धोकादायक खड्डा कधी दुरुस्त होणार? कि मोठ्या अपघातानंतरच प्रशासन जागे होणार ? या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप करत जेष्ठ जनसेविका श्रीमती वर्षाताई नाईक यांनी संबंधित विभागाला जाब विचारला आहे.

धनकवडी परिसर हा नेहमीच रहदारीने गजबजलेला असून या मार्गावरून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते.अशा ठिकाणी ओढ्यालगत निर्माण झालेला हा खोल खड्डा नागरिकांसाठी गंभीर धोका ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे एखादा नागरिक किंवा वाहनचालक खड्ड्यात पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आता पावसाळा सुरु होईल तेव्हा मोठा पाऊस झाला तर पावसाचे पाणी तो खड्डा असलेल्या रस्त्यावर गुडघ्या इतके असते त्यामुळे तो खड्डा व त्या खड्ड्यावर ठेवलेली जाळी देखील दिसणार नाही. त्यामुळे या ठिकाणी भीषण अपघात घडू शकतो
याबाबत संताप व्यक्त करताना श्रीमती वर्षाताई नाईक म्हणाल्या की, “नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे. हा खड्डा अनेक दिवसांपासून तसाच उघडा असून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. एखादा मोठा अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक नागरिकांनीही वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त केली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार,याच खड्ड्यावर लोखंडी जाळी टाकण्यात आली असून त्यावर एक बहुदा सिमेंटचे बुजगावणे उभे केले आहे. या खड्ड्या नजीक कुठलाही सूचना फलक किंवा प्रतिबंधक व्यवस्था नसल्याने धोका अधिक वाढला आहे.
श्रीमती वर्षाताई नाईक यांनी पुणे महानगरपालिका व संबंधित विभागाने तातडीने या ठिकाणी पाहणी करून खड्डा बुजवावा, त्यावर योग्य ती सुरक्षेची मजबीत साधने बसवावीत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
धनकवडीतील नागरिकांमध्ये सध्या एकच प्रश्न चर्चिला जात आहे तो म्हणजे या ठिकाणी “मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, की त्याआधीच या धोकादायक खड्ड्याची दुरुस्ती होणार?”

