
जाधव यांनी सांगितले की, वादळी पावसामुळे अजूनही काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असण्याची शक्यता असून, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शिरूर तालुक्याच्या कवठे येमाई परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कर्ज काढून, मेहनत घेऊन उभी केलेली पिके या पावसामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.पिकांवर केलेला खर्च, घेतलेली कर्जे आणि त्याची परतफेड कशी करायची, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. “आता जगायचे कसे?” अशी हतबल भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर युवा क्रांती फाउंडेशन राष्ट्रीय किसान विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुभाष शेटे यांनी शासनाकडे तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होताच त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, असे त्यांनी आवाहन केले आहे.शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

