समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – आगामी खरीप हंगाम २०२५ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना फायदेशीर व मार्गदर्शक ठरेल या दृष्टीने शिरूर पंचायत समिती सभागृहात आज मंगळवार दि. ०६ रोजी तालुकास्तरीय खरीप हंगाम पुर्व कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरुनगर सतीश शिरसाठ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव येथील शास्त्रज्ञ डॉ दत्तात्रय गावडे उपस्थित होते.या कार्यशाळेसाठी तालुका कृषी अधिकारी शिरूर श्रीमती सुवर्णा आदक, मंडळ कृषी अधिकारी श्रीमती धनश्री चासकर,अनिल पाटील,संपत कंठाळे यांचेसह तालुक्यातील सर्व कृषी पर्यवेक्षक कृषी सहायक,पिक स्पर्धामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या ताराबाई बांदल तसेच कृषी भुषण पुरस्काराने सन्मानित रामचंद्र नागवडे व इतर प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजच्या या एक दिवसीय कृषी मार्गदर्शन कार्यशाळेत डॉ.दत्तात्रय गावडे यांनी नैसर्गिक शेती,सेंद्रिय शेती,विषमुक्त शेती व नियमित शेती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तसेच शिक्रापूरच्या मंडळ कृषी अधिकारी, धनश्री चासकर यांनी पीएमएफएमई अंतर्गत खाद्य उद्योगांना अर्थसहाय्य या विषयावर मार्गदर्शन केले, कृषी सहायक प्रशांत दोरगे यांनी सुपरकेन नर्सरी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी संपत कंठाळे यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेतीचे मिशन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सेंद्रीय शेती या विषयावर प्रगतशील शेतकरी कांतीलाल नलगे यांनी विचार व्यक्त केले. कृषी सेवक अशोक जाधव यांनी गटाची स्थापना, फार्मर कंपनीची स्थापना, याबाबत तर कृषी सहायक जयवंत भगत यांनी मुग लागवड, तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची उपस्थितांना सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांशी सु संवाद साधला.त्या नंतर या कार्यशाळेची सांगता करण्यात आली.