शिरूरमध्ये साखर कारखान्याची २४ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

78
  समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक – शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथील साखर कारखान्याची तब्बल २४ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल रामदास भाकरे (वय ३६, रा. माळवाडी, टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरख भारमल राठोड, नितीन तुळशीराम चव्हाण आणि ज्ञानेश्वर गबरू राठोड (सर्व रा. घोडेगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दि. १४ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रावडेवाडी येथील पराग अॅग्रो फूड्स अॅण्ड अलाईड प्रॉडक्ट्स प्रा. लि. या साखर कारखान्यात संबंधित आरोपींनी ऊसतोड मजूर पुरवठा करण्याचे खोटे आश्वासन दिले. यासाठी त्यांनी लेखी करार करून विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी संगनमताने अनुक्रमे ८,१८,००० रुपये, ४,८६,००० रुपये आणि ११,३४,००० रुपये असे एकूण २४,३८,००० रुपये त्यांच्या बँक खात्यावर घेतले. मात्र प्रत्यक्षात कोणताही मजूर पुरवठा न करता कारखान्याची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सायं. ४:३४ वाजता गुन्हा क्रमांक ३५२/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत असून, गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस हवालदार जाधव यांनी केले आहे.शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *