समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – काल रविवार दि.३ मे २०२६ रोजी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात पार पडली. राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश्वर हेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सभेला सुरुवात झाली. नसरापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेतील चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करून ऑनलाईन सभेची सुरुवात करण्यात आली.

संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी अध्यक्षस्थान स्वीकारत समाजातील वाढत्या अत्याचारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “समाज एकत्र आला तरच अन्याय थांबेल,” असे ठाम मत त्यांनी मांडले. घरातील संस्कार, जागरूकता आणि नागरिकांची जबाबदारी यावर त्यांनी विशेष भर दिला.पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अमर पठारे यांनी नसरापूर घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे सांगत,अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलन किंवा मोर्चा न काढता कायदेशीर मार्गाने पोलिसांना निवेदन देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष (प्रभारी) शिवाजीराव शेलार यांनी समाजातील बिघडलेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत “Good Touch – Bad Touch” शिक्षण लहान मुलांना देण्याची गरज अधोरेखित केली. तसेच संघटनेतील निष्क्रिय सदस्यांवर कारवाई आणि आयडी नूतनीकरणाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट शब्दात विशद केले.
राज्य प्रदेशाध्यक्ष हभप मधुकर महाराज अहिरे यांनी संघटनेच्या शिस्तीवर भर देत,आयडी रिन्यू न करणाऱ्या सदस्यांवर कारवाई का केली याची माहिती दिली. तसेच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी सक्रिय सदस्यत्व आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.राष्ट्रीय मीडिया प्रमुख,मार्गदर्शक तथा राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा. सुभाष शेटे यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत सदस्य जोडो अभियानाला गती देण्याचे आवाहन केले. “राष्ट्रीय किसान विकास मंच” या नव्या युनिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करण्याची सुरेख दिशा त्यांनी दिली.
दरम्यान, २१ मे २०२६ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या युवा क्रांतीच्या चौथ्या वर्धापन दिनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असून, उपस्थिती व शिस्त यावर विशेष भर देण्यात आला आहे.सभेच्या शेवटी डॉ.राजेश्वर हेंद्रे यांनी सर्वांचे आभार मानून ऑनलाईन सभेची सांगता करण्यात आली.

