तांदळीतील भूमिपूजन फलकाची मध्यरात्री तोडफोड; संतप्त नागरिकांची कठोर कारवाईची मागणी

430

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील तांदळी गावातील मळई रस्ता विकासकामाच्या भूमिपूजनासाठी उभारण्यात आलेल्या फलकाची अज्ञात समाजकंटकाने मध्यरात्री वाकवून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सार्वजनिक मालमत्तेची जाणीवपूर्वक हानी केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून,दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.या प्रकरणी तांदळी ते म्हसोबावाडी रस्त्याचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर ऋषिकेश निंबाळकर यांनी शिरूर पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली आहे.
सदर मळई रस्ता विकासकाम हे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माउली आबा) कटके यांच्या विकास निधीतून मंजूर झाले असून, नुकतेच या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, विकासकामाला गालबोट लावण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तींनी भूमिपूजन फलकाची तोडफोड करून नुकसान केल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व अत्याधुनिक तपास यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांकडून करण्यात आली आहे.
सार्वजनिक विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्या व सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करून अशा प्रवृत्तींना आळा घालावा,अशीही मागणी जोर धरत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *