समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – समाजातील अंधश्रद्धा, भोंदूगिरी,बुवाबाजी व अमानवी प्रथा यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (MANS) च्या माध्यमातून राज्यभर व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि अंधश्रद्धेपासून समाजाची मुक्तता करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारणी सदस्या तथा महाराष्ट्र राज्य बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह नंदिनी जाधव यांनी सा.समाजशील शी बोलताना केले आहे.



समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या या चळवळीने गेल्या काही वर्षांत गावोगावी जाऊन लोकांमध्ये जागृती निर्माण केली आहे. तसेच विविध शिबिरे, प्रबोधनपर कार्यक्रम, व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून बुवाबाजी,भोंदू बाबांच्या तथाकथित चमत्कारांचा पर्दाफाश करण्यात येत आहे.
अंधश्रद्धा व जादूटोणा यांसारख्या कुप्रथांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत मानवी बळी, जादूटोणा, भूतबाधा काढण्याच्या नावाखाली होणारे अत्याचार, तसेच चमत्काराच्या नावाखाली होणारी फसवणूक यांना कठोर शिक्षा करण्यात येते.राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष तात्काळ निर्माण करण्याचे मत ही जाधव यांनी व्यक्त करतानाच शासनाचा तसा आदेश असताना तो केवळ कागदावरच अडकला कि काय ? अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.अनेकदा नागरिकांची भोंदूबाबाकडून गुप्तधन काढून देतो असे सांगून त्यांचे आर्थिक,मानसिक व शारीरीक शोषण केले जाते भोंदू बाबाकडून अशी फसवणूक झाल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राज्य बुवाबाजी संघर्ष विभाग समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही चमत्कारांवर किंवा अफवांवर आंधळा विश्वास ठेवू नये. संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांत किंवा संबंधित संस्थांकडे तक्रार करावी. तसेच मुलांमध्ये लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.असेच काही अघोरी प्रकार घडताना कोणाला निदर्शनास आल्यास तात्काळ राज्य बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह नंदिनी जाधव यांच्या ९४२२३०५९२९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.
अंधश्रद्धा ही समाजाच्या प्रगतीस अडथळा ठरत असून, तिचे निर्मूलन करण्यासाठी शासन, संस्था आणि नागरिक यांचा संयुक्त सहभाग आवश्यक असल्याचे मत नंदिनी जाधव यांनी व्यक्त केले आहे.

