कवठे येमाई,पुणे : राज्यात लवकरच ई हक्क प्रणाली सुरु होणार; खातेदारांसाठी व तलाठी यांना उपयुक्त ठरणार ही ऑनलाईन सुविधा – रामदास जगताप; राज्य समन्वयक,ई फेरफार प्रकल्प

1338
        कवठे येमाई,पुणे : महसूल विभागा अंतर्गत असणारे खातेदार व तलाठी यांना उपयुक्त ठरणारी  ई हक्क प्रणाली राज्यात लवकरच सुरु होणार असल्याची माहिती ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
         जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने व जिल्हाधिकारी पुणे यांच्या मदतीने ई हक्क नावाने एक नवीन ऑनलाईन आज्ञावली ( PDE – Public Data Entry ) विकसित करणेत आले असून या मध्ये कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात अथवा  घरीबसून दाखल करता येतील. या मध्ये सध्या पहिल्या टप्प्यात १. वारस नोंद २. बोजा दाखल करणे , ३. बोजा कमी करणे , ४. ई करार नोंदी , ५. मयताचे नाव कमी करणे ६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे , ७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे व ८. विश्वास्थांचे नाव कमी करणे असे आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित व्यक्तीला ई हक्क प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहेत. अशा फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्र जोडावी लागतील त्यांची यादी देखील देण्यात आली असून संबंधित कागदपत्र स्कॅन करून ( स्वयं साक्षांकित प्रत) पीडीएफ स्वरुपात अपलोड करता येणार आहेत.
            अशा पद्धतीने दाखल केलेल्या प्रत्येक अर्जाला अर्ज नंबर ( aplicatiopn ID) मिळणार असून  व त्याची ऑनलाईन पोहोच देखील अर्जदाराला मिळणार आहे. आपल्या अर्जांची स्थिती अर्जदाराला प्रत्येक टप्प्यावर तपासता येणार असून प्रत्येक टप्प्यावर आपला अर्ज स्वीकारला का ? किंवा काय कारण देवुन परत पाठवला ? , फेरफार तयार केला आहे का ? नोटीस काढली आहे का ? नोटीस बजावण्यात आली आहे का किंवा रुजू करणेत आली आहे का ? फेरफार मुदतीत काही हरकत आली आहे का ? फेरफार मंजूर झाला का ? ऑनलाईन ७/१२ दुरुस्त झाला का ? अशा प्रत्येक टप्प्यावर मोबाईलवर मेसेज येणार आहेत. खातेदाराने असा भरलेला अर्ज तलाठ्याकडे ऑनलाईन जाईल व  तो योग्य असल्याची खात्री करून तलाठी तो अर्ज स्वीकारील अथवा कारण देवुन पुन्हा अर्जदाराकडे दुरुस्ती साठी परत अर्जदाराकडे पाठवेल किंवा पूर्णतः कारण नमूद करून नाकारण्यात ही येणार आहे. या साठी प्रत्येक अर्जदाराने या प्रणालीवर अर्ज दाखल करताना आपला मोबाईल नंबर देवुन नोंदणी करणे आवश्यक असणार आहे .
   याच प्रणाली मध्ये माहिती भरून तलाठी देखील फेरफार घेणार आहेत.  त्यामुळे ऑनलाईन अर्ज आल्यास तलाठ्याला पुन्हा डेटा एन्ट्री करावी लागणार नाही.  पर्यायाने तलाठी यांना देखील ही प्रणाली सहाय्यभूत ठरणार आहे. वरिष्ठ महसूल अधिकार्यांना देखील अशा सर्व अर्जांचा आढावा घेण्यासाठी mis करून दिले जाणार आहेत.  या मुळे महसूल प्रशासनामध्ये पारदर्शकता व गतिमानता येण्यास आणखी बरीच मदत होईल असा विश्वास रामदास जगताप यांनी व्यक्त केला आहे.या ई हक्क प्रणालीचे राज्यात सर्वप्रथम पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात नुकतेच टेस्टिंग पूर्ण झाले असून लवकरच ई फेरफार प्रणाली  CLOUD वर स्थानांतरीत केल्या नंतर पूर्ण राज्यात उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
– प्रा.सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *