मुरबाड,ठाणे : कल्याण – माळशेज – नगर असा प्रलंबित रेल्वेमार्ग होण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती करून मोठे जनआंदोलन 2019 आधी उभारणार असून तालुक्यातील सर्व गावातील नागरिकांनी तसा निर्धार करण्यासाठी संपर्क अभियान सुरु असल्याची माहिती कल्याण- माळशेज-नगर नव्याने तयार झालेल्या रेल्वे संघर्ष समितीचे समन्वयक चेतनसिंह पवार यांनी सा.समाजशिलशी बोलताना दिली. दिवाळी निमित्त पत्रकारांशी हितगुज करताना आपल्या अंदोलनाची भुमिका स्पष्ट केली
कल्याण ते नगर अशा रेल्वेमार्गाचे पाहिले सर्व्हेक्षण सन १९५० साली झाले होते. त्यानंतर सन १९७३, २००३ साली ही झाले, २०१० साली रेल्वे बजेटमध्ये या २५० किमीच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत अंदाजित ७७२ कोटी खर्च मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर या रेल्वेमार्गाबाबत सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. हा लांब पल्ल्याचा रेल्वेमार्ग झाल्यास घाटमाथ्यावरील शेतीमालाला मुंबईसारखी बाजारपेठ सहज उपलब्ध होईल.तर मराठवाड्याला जोडणारा सर्वात रेल्वे मार्ग ठरणार आहे. त्याच प्रमाणे मुरबाड औदयोगिक क्षेत्रातील बंद पडलेले उद्योग, कारखाने यांना चालना मिळून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. मागे काय झाले कोणी किती आश्वासने दिली हे बोलण्या पेक्षा कृतीत उतरुन काम करण्याची गरज असल्याचा निश्चय पवार यांनी बोलुन दाखवला.
मुरबाड शेजारील शहापूर तालुक्यातुन लांब पल्ल्याची रेल्वे मार्ग गेल्याने झपाट्याने विकास झाला अनेक मोठंमोठ्या अभियांत्रिकी, मेडिकल शैक्षणिक संस्था राहिल्याने येथील विकासात हातभार लागला.. या साठी कल्याण- माळशेज – नगर रेल्वे मार्ग मुरबाडच्या विकासासाठी गरजेचा असल्याने रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून रेल्वेबाबत जनजागृती साठी समितीने तालुक्यातील प्रत्येक गावांत संपर्क अभियान सुरु असून, भविष्यात रेल्वेसाठी मेळावे घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीचे ठराव घेणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी टिटवाळा – मुरबाड रेल्वे म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे सांगत सन २०१५ सालच्या रेल्वे बजेटमध्ये टिटवाळा – मुरबाड अशा रेल्वेमार्गाच्या सर्व्हेक्षण करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र फारश्या उत्पन्नाची हमी नसल्याचे कारण दाखवल्याने हा सर्वे दिवा स्वप्न च ठरले. याबाबत खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साथला असता मुख्यमंत्री देवेद्र फडणविस यांनी अर्थिक तरतुद करण्याची हमी दिली, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी बजेट मध्ये घेणार हे हि सांगितले मात्र रेल्वे प्रशासनाने प्रस्तावच पुढे न पाठवल्याने आमचाही दिशाभुल झाल्याची कबुली दिली. यावेळी त्यानी निवडणुकी पुर्वी सादर होणाऱ्या मिनी अर्थिक बजेट मध्ये या मार्गासाठी अर्थिक तरतुद होईल असे हि सांगितले. मात्र रेल्वे मुरबाड शी जोडली गेली पाहिजे व रेल्वेचे दिवास्वप्न प्रत्यक्षात साकारावे एवढेच मुरबाड करांची मागणी आहे.
– प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)